नंदुरबार : मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धास्थाने नसून, ती समाजाची प्रेरणास्थाने आहेत, हा विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न नंदुरबारमधील श्री संकष्टा देवी मंदिर ट्रस्टने वेळोवेळी केला आहे. यंदा नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून ट्रस्टने अन्नपूर्णा प्रकल्प ट्रस्टने सुरू केला आहे. मंदिरात भाविकांकडून आलेले सर्व धान्य जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील चिखली कानडी येथे सुरू असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला देण्यात आले. हा उपक्रम समाजाला नक्कीच वेगळी दिशा देणारा ठरेल.
आश्विन शुद्ध षष्ठीला जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते नंदनगरीची ग्रामदेवता श्री संकष्टाईची महाआरती करण्यात आली. त्याच वेळी अन्नपूर्णा प्रकल्पांतर्गत मंदिरात आलेले सर्व धान्य त्यांच्या हस्ते वनवासी कल्याण आश्रमाचे प्रतिनिधी वसंतभाई शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या वेळी नंदुरबारमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. वर्षा बऱ्हाणपूरकर, राजेंद्र बऱ्हाणपूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.